Business

Header Ads

उन्हाळ्याच्या उष्णतेपासून मुलांचे संरक्षण कसे करावे: उष्माघात टाळण्यासाठी पालकांसाठी मार्गदर्शक

डॉ. केता वाघा, एसोसिएट प्रोफेसर, जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज, वर्धा

महाराष्ट्र : संपूर्ण देशात उन्हाळ्यात तापमान खूप वाढत आहे. अशा वेळी मुलांचे खेळणे कधी कधी त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते. उष्णतेमुळे होणारे आजार, जसे की उष्णतेचा थकवा आणि उष्माघात वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असतात आणि मुलांवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. लहान मुलांचे शरीर प्रौढांप्रमाणे तापमान नीट नियंत्रित करू शकत नाही, त्यामुळे ते उष्णतेसाठी अधिक संवेदनशील असतात. 

खेळताना त्यांच्या शरीरात उष्णता लवकर वाढते आणि शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) किंवा जास्त गरम होण्याची सुरुवातीची लक्षणे त्यांना पटकन समजत नाहीत. लहान मुले पाणी पिणे आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी पूर्णपणे मोठ्यांवर अवलंबून असतात. बाहेर खेळताना, शाळेत जाताना, गर्दीच्या वाहनातून प्रवास करताना किंवा कमी हवेशीर घरात राहताना मुले लवकरच जास्त गरम होऊ शकतात आणि त्यांची तब्येत बिघडू शकते. 

लहान मुलांना जास्त धोका का असतो ? 

लहान मुलांना उष्णतेचा धोका जास्त असतो कारण खेळताना त्यांच्या शरीरातून पाणी लवकर निघून जाते आणि ते खेळात गुंतल्यामुळे पाणी पिणे विसरतात. छोटे बाळ आणि लहान मुले त्यांना होणारा त्रास नीट सांगू शकत नाहीत, त्यामुळे त्यांची तब्येत लवकर बिघडू शकते. शाळेत जाणारी मुले थकवा आला तरीही खेळणे किंवा शारीरिक हालचाल सुरूच ठेवतात.

काही परिस्थितींमध्ये धोका अधिक वाढतो. जसे की, मुले सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत कडक उन्हात बाहेर खेळतात, किंवा लहान बाळांना खूप जास्त कपडे घातले जातात. बंद किंवा पार्क केलेल्या गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या मुलांनाही धोका जास्त असतो. तसेच ज्यांना ताप, जुलाब, उलटी, लठ्ठपणा, हृदयविकार किंवा इतर दीर्घकालीन आजार आहेत अशा मुलांना उष्णतेमुळे जास्त त्रास होऊ शकतो. तसेच कमी हवा खेळती असलेल्या घरांमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी राहणारी मुले त्यांनाही उष्णतेचा त्रास होऊ शकतो.

उष्माघात म्हणजे काय ? 

उष्माघात हा उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांचा सर्वात गंभीर प्रकार आहे. यात शरीराचे तापमान खूप जास्त वाढते आणि शरीर स्वतःला थंड ठेवण्याची क्षमता गमावते. ही एक वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आहे. वेळेवर उपचार न केल्यास मेंदू, किडनी आणि हृदयाला गंभीर नुकसान होऊ शकते आणि जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो.

चेतावणीची लक्षणे: याकडे दुर्लक्ष करू नका 

उष्णतेच्या त्रासाची सुरुवातीची लक्षणे म्हणजे जास्त घाम येणे, खूप तहान लागणे, अशक्तपणा किंवा थकवा जाणवणे, डोकेदुखी, चक्कर येणे, चिडचिड होणे, स्नायूंमध्ये गोळे येणे आणि मळमळ किंवा उलटी होणे. जर त्रास वाढला आणि उष्माघात झाला, तर शरीराचे तापमान खूप वाढते. त्वचा गरम आणि लालसर होते. घाम कमी येतो किंवा त्वचा कोरडी पडते. हृदयाची धडधड वाढते. गोंधळ होतो किंवा वागणूक विचित्र होते. चालताना त्रास होतो, खूप झोप येते, झटके येऊ शकतात आणि बेशुद्धीही येऊ शकते.

पालकांनी तातडीने काय करावे 

जर उष्माघाताचा संशय आला असेल, तर मुलाला लगेच थंड किंवा सावलीच्या ठिकाणी न्यावे. त्याचे जास्तीचे कपडे काढून टाकावेत. थंड पाण्याने किंवा ओल्या कापडाने शरीर पुसावे. पंखा उपलब्ध असल्यास त्याचा वापर करा. मान, बगल आणि मांड्या या भागांवर थंड पट्ट्या ठेवावे. जर मूल शुद्धीत असेल आणि नीट बोलू शकत असेल तर त्याला थोडे थोडे पाणी किंवा ओआरएस द्यावे. पण जर मूल बेशुद्ध असेल, वारंवार उलटी होत असेल, गोंधळलेले वाटत असेल किंवा त्याला झटके येत असतील तर तात्काळ डॉक्टरांची मदत घ्यावी. 

उपचार करण्यास अजिबात उशीर करू नयेत.
मुलांसाठी उन्हाळ्यातील सुरक्षिततेचे नियम 
मुलांना तहान लागली नसली तरीही वारंवार पाणी द्यावे. ओआरएस, लिंबूपाणी, नारळपाणी आणि ताक यासारखी पेये द्यावीत. मुलांना सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे घालावेत. लहान बाळांना थंड आणि हवा खेळती असलेल्या खोलीत ठेवावे. जास्त उष्णतेच्या वेळेत घरातच खेळण्यास सांगावे. बाहेर जाताना टोपी, छत्री आणि सनग्लासेस वापरावेत. शाळेत पाण्याची बाटली नेहमी भरलेली आहे याची खात्री करावी. 

त्याचप्रमाणे मुलांना बंद किंवा पार्क केलेल्या गाडीत कधीही ठेवू नये, अगदी काही मिनिटांसाठीही नाही. दुपारच्या तीव्र उन्हात जोरदार बाहेरचा खेळ टाळावा. जास्त साखर किंवा कॅफिन असलेली पेये देऊ नयेत. उलटी किंवा असामान्य झोप येणे याकडे दुर्लक्ष करू नये. लहान बाळांना जास्त कपडे घालू नयेत.

मुलांसाठी उन्हाळ्यातील उत्तम आहार 
लहान मुलांसाठी उन्हाळ्यात योग्य आहार देणे खूप महत्त्वाचे आहे. शरीराला पाण्याची गरज फक्त पाणी पिण्यानेच नाही तर काही अन्नपदार्थांमधूनही पूर्ण होते. म्हणून आहारात कलिंगड, काकडी, संत्री आणि हंगामी फळे मर्यादित प्रमाणात द्यावीत. नारळपाणी, ताक, लिंबूपाणी लिंबूपाणीही खूप उपयुक्त असतात. हलके आणि घरचे बनवलेले जेवण द्यावे. हे पदार्थ शरीराला थंड ठेवण्यास मदत करतात. मात्र तळलेले आणि जास्त तेलकट पदार्थ, जास्त साखर असलेले सॉफ्ट ड्रिंक्स आणि कॅफिनयुक्त पेये टाळावीत.

गैरसमज आणि सत्य

गैरसमज: “माझे मूल घाम येत असेल तर ते सुरक्षित आहे.” 
सत्य: गंभीर उष्णतेचा त्रास वेगाने वाढू शकतो आणि उष्माघाताच्या शेवटच्या टप्प्यात घाम येणे थांबू शकते.
गैरसमज: “फक्त बाहेर खेळणाऱ्या मुलांनाच उष्माघात होतो.”
सत्य: कमी हवा खेळती असलेल्या घरात किंवा बंद जागेत राहिल्यानेही शरीर जास्त गरम होऊन उष्माघाताचा धोका निर्माण होऊ शकतो.
गैरसमज: “फक्त थंड पेये पिल्याने उष्माघात टाळता येतो.” 
सत्य: योग्य प्रमाणात पाणी पिणे, शरीर थंड ठेवणे, पुरेशी विश्रांती घेणे आणि उन्हापासून दूर राहणे हे सर्व खूप महत्त्वाचे आहे.

पालकांसाठी संदेश 

उन्हाळा हा आनंदाचा आणि चांगल्या आठवणींचा काळ असावा, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा नाही. मुलांकडे नीट लक्ष द्या, त्यांना भरपूर पाणी पिण्यास सांगा आणि कडक उन्हापासून दूर ठेवा. काही सोप्या खबरदारीने एखाद्याचा जीव वाचू शकतो.

Post a Comment

0 Comments